राजकीय
शिरूर लोकसभेच्या मैदानात खासदार अमोल कोल्हे यांना धूळ चारण्याची, अजित पवारांनी भीष्म प्रतिज्ञा पूर्ण होणार की, वल्गना ठरणार?
लोकसभेचे पडघम सर्वत्र वाजू लागले आहेत सर्वच पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर मैदानात उतरले आहेत. लोकसभेच्या महासंग्रामाची धार आता दिवसेंदिवस वाढणार आहे. अनेक पक्षांकडून डाव प्रतिडाव टाकले जाणार नवनवीन रणनितीचाही अवलंब होणार, अनेक धक्का तंत्रांचा हि वापर होणार, यात काही शंका नाही. राजकारण म्हटले की, या सर्व गोष्टी आल्याच, त्यात कुणाचा डाव यशस्वी होतो. हे तर कालच ठरवेल, सध्या शिरुर लोकसभा मतदार संघ मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका भीष्म प्रतिज्ञेमुळे प्रचंड प्रकाश झोतात आला आहे. त्यामुळे या मतदार संघातील मतदार काकांचा उमेदवार विजयी करतो कि, काकांच्या व्युवरचणे पुढे पुतणे व मानसपुत्र यांची जोडी वरचढ ठरते हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाला शिरूर साठी पक्षात एकही निष्ठावान सक्षम उमेदवार मिळत नसल्याने त्यांच्यावर इतर पक्षातून उमेदवार आयात करण्याची वेळ येणार? की ही जागाच इतर पक्षाला आंदण द्यावी लागणार? त्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याबाबत मतदार संघात सर्वत्र मोठी चर्चा सुरू आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी बंड पुकारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा देशाचे माजी संरक्षण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ,आपले गुरू व काका शरद पवार यांना बाजूला सरकावत पक्षाची सूत्रे हातात घेतली.
त्यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला हा निर्णय त्यांच्या भवितव्यासाठी खरोखरीच योग्य ठरणार असल्याचे दिसतआहे. कारण खासदार अमोल कोल्हे यांची मतदार संघातच नव्हे तर संपुर्ण राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे ओळख झाली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा प्रमाणे विवेकाशील, सक्षम ,संस्कारक्षम, आदर करणारा, गुरू व माता पित्या समोर नम्र असणारा परंतु लढावय्या योद्धा काहीशी अशीच प्रतिमा खासदार अमोल कोल्हे यांची शिरूर लोकसभा मतदार संघात झाली आहे. त्यामुळे त्यातच देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांना मानणारा प्रचंड मोठा मतदार या मतदार संघात आहे.वयाच्या उतार काळात सर्वात जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तींनी शरद पवार यांना धोका दिल्याची सल मतदारांच्या मनात खोलवर असल्याचे दिसते त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याकडून मागील काळात मतदार संघात दुर्लक्ष करण्याचे प्रकारावर मतदारांनी दुर्लक्ष करून मतदार कौल कोल्हे यांच्या बाजूने साथ देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांपुढे व काही सभांमध्ये बोलताना खासदार अमोल कोल्हे यांना त्यांची जागा दाखविणार व शिरूर लोकसभा मतदार संघ ताब्यात घेणार अशी भीष्म प्रतिज्ञा केली होती. परंतु ही प्रतिज्ञा आता वल्गना ठरणार की काय? अशीच चिन्हे सध्या मतदार संघात पहावयास मिळत आहे.
शिरूर मतदार संघात शरद पवार यांचे एकेकाळचे मानस पुत्र, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस चे विविध विधानसभा क्षेत्राचे बहुतांश आमदार हे अजित पवार गटाचे आहेत. त्याच बरोबर अनेक नामवंत कार्यकर्ते देखील या मतदार संघात आहेत परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द सत्यात उतरविण्यासाठी व त्यांचा शब्द सत्य करण्यासाठी एकही निष्ठावंत कार्यकर्ता अथवा नेता हे निवडणुकीचे शिव धनुष्य उचलण्यास समर्थ दिसत नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणूक जाहीर होऊनही अद्याप शिरूर लोकसभेसाठी अजित पवार यांच्या पक्षाला एकही निष्ठावान उमेदवार मिळत नाही. ही शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल अशी चर्चा सुरू आहे.
आचार संहिता जाहित झाली तरीही अद्यापही अजित पवार गट येथील उमेदवारी जाहीर करू शकलेला नाही तर त्यांना शिवसेनेतून (शिंदे गट) किंवा भाजपातून उमेदवार आयात करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. वेळ पुढे सरकत आहे निवडणुकांच्या तारखाही तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे कोल्हे यांना चिटपट करून आपली भीष्म प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी पवार यांनी आपला उमेदवार जाहीर करणे अत्यावश्यक आहे. कारण उमेदवारास मतदार संघात सर्वत्र आपले चिन्ह लोकांपर्यंत पोहचवून मतदारांना गावोगावी जाऊन साद घालावी लागणार आहे. यासाठी उमेदवाराला प्रचारासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे.
एखादा उमेदवार आयात करून त्यामार्फत कोल्हेना चितपट केले जाईल का? यातही शंकाच आहे. कारण ज्या उमेदवारांना आयात करण्याबाबत चर्चा आहे त्या उमेदवारांनी आपला पक्ष सोडल्यानंतर त्याची आजची असलेली प्रतिमा मतदारांमध्ये शाबूत राहील का?किंवा आयात उमेदवाराच्या पक्षप्रवेशानंतर शिवसेनेतील कार्यकर्ते मनापासून काम करतील का? तसेच उमेदवार आयात केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षणातील निष्ठवंत त्यांना स्वीकारतील का? हेही पाहावे लागणार आहे.
कारण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एका आमदाराने तर आयात उमेदवारास पाठिंबा देण्यास स्पष्ट नकारच अनेक प्रसार माध्यमांपुढे दिला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे ज्याच्या समोर पक्षासाठी झुंजलेले कार्यकर्ते आयात उमेदवारास किती स्वीकारतील हि आगामी काळातच समजेल .
पुढील काळात शिरूर लोकसभेची उमेदवारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षास मोठी डोकेदुखी ठरणार? कि, उपमुख्यमंत्री यावर तोडगा काढण्यात यशस्वी ठरणार ? किंवा ही जागाच शिवसेना (शिंदे गटाला) बहाल करणार? व आपली प्रतिज्ञा ही फक्त राजकीय व्यासपीठावरील डावपेच होता हे दाखविणार हे येणारा काळच उत्तर देणार आहे.