राजकीय

“नेते आहेत मस्त”, अन “कार्यकर्ते होत आहेत उध्वस्त”

Published

on

आज रंग पंचमी” हा शब्द ऐकला कि अनेक रंग आठवतात या एकमेकांच्या संगतीने या रंगीबेरंगी रंगाची उधळण करीत प्रत्येक व्यक्ती आयुष्याला नवीन रंग देण्याचा प्रयत्न करतो. त्यात कुणाचे आयुष्य आनंदाने रंगते, तर काहींचे …… हा खेळ असाच सुरू आहे. 

आज प्रत्येक व्यक्ती काहीतरी मिळविण्यासाठी पळत आहे. ते त्याचे ध्येय साध्य झाले तर ठीक नाहीतर दुसरे काहीतरी साध्य करण्यासाठी  जीवनाच्या मायाजाळात तो गुरफत जात आहे.प्रत्येक वेळी रस्ता शोधण्याचा प्रयत्न करताना पुन्हा रस्ता भरकटत आहे. असाच काहीसा खेळ ही राजकीय पटलावर आंबेगाव तालुक्यात पहावयास मिळत आहे.

  या खेळाचे रिंग मास्टर,, अनेकदा या कार्यकर्त्यांना  काही स्थैर्याची आमिषे दाखवून वापरून घेत आहेत. व अनेक कार्यकर्ते या पक्षीय भावनेत एवढे रममाण होतात की, आपण सोशल मीडियावर कोणाबद्दल काय वाक्य उच्चारतो हेच यांना कळू नये ही शोकांतिका आहे. जवळचे मित्र नातेवाईक, अशी नाती असतानाही हे सर्व सोशल मीडियावर आपला नेता किती चांगला हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आपली निष्ठा किती खरी आहे. हे दाखविण्याचा प्रयत्न करून घातलेल्या वादात स्वतः निष्ठावंत आहात हे दाखविण्याच्या नादात अनेक जण  आपल्या नातेवाईकांपासून दुरावलेले दिसतात. 

   दरम्यान अनेक कार्यकर्ते नेत्यांच्या संगतीत आपले पुढील भविष्य उज्वल होईल या धारणेने त्यात गुंतत जातात.व या मायाजाळात गुंतून, बदलणाऱ्या ऋतुप्रमाणे  वारंवार गुंतत जातात. परंतु बहुतांश कार्यकर्त्यांचा वेळ घोषणा देण्यात तर पुढे पुढे करण्यात जातो.  काहींनी  तर कधी आपल्या आपल्या जीवनात माता पित्यांचे दर्शन घेतले नसेल, पण नेता आला की, हे त्यांचे पददर्शन घेण्यासाठी तुटून पडतात

 

दरम्यान अशी अनेक वर्षांची परंपरा अखंडित पणे सातत्याने सुरू आहे. परंतु हे नेते या कार्यकर्त्यांना भुलविण्यात पटाईत असतात. वेगवेगळ्या कल्पना शोधून कार्यकर्त्यांना झुलवत ठेवणे, त्यांना चांगले जमते व या नेत्यांची उठाठेव करण्यात व विरोधकांवर आसूड ओढण्यात यांचे सर्व जीवन जाते जवळचे नातेवाईक मित्र आप्तेष्ट दुरावतात द्वेष तयार होतात, आर्थिक परिस्थिती दुर्बल होते. व कुटुंब देशोधडीला केंव्हा लागते हे या कार्यकर्त्यांना समजत नाही.

 दरम्यान यात “नेते मात्र मालामाल, आणि ” कार्यकर्त्यांचे  मात्र खूपच बेकार हाल”  अशी अनेक उदाहरणे आहेत तसा हा खेळ फक्त एकाच मतदार संघालाच लागू होतो असे नाही. तर सर्व राज्यात ,देशात किंबहुना जगातही अशीच अवस्था असू शकते. म्हणतात कि, परमेश्वराने सृष्टी निर्माण केली त्यावेळी अनेक प्राणी तयार केले.

 परंतु मानवाची निर्मिती शेवटी केली मनुष्य तयार करण्यासाठी परमेश्वराने खूप वेळ घेतला.असेही म्हणतात कि, निर्माण केलेल्या ८४ लक्ष योणींच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी, जीवासाठी मनुष्य देह निर्माण केला. या बुद्धिमान व्यक्तीपासून जगाचा उत्कर्ष होईल, कल्याण होईल, असेच पाहिले असावे.परंतु हेही तितकेच खरे की कल्याण होणे म्हणजे नक्की काय याचा अर्थ ज्याने त्याने स्वतःचे गरजे नुसार घेतला असावा  म्हणून येथेच गल्लत झाली असावी.

 असो आध्यत्मिक गोष्टीबाबत जेवढे बोलाल तेव्हडे गुढ च आहे. आणि असेच एक राजकीय गुढ , मतदार संघातील जवळ जवळ सर्वच पक्षांच्या कार्यकऱयापुढे निर्माण झाले आहे. सध्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर काही नेत्यांच्या  एकत्रित येण्याने वरवर सर्वत्र “आबादी,आबाद” जरी दिसत असली. तरी कार्यर्त्यांच्या मनातील गेल्या वीस वर्षांत झालेल्या जखमांचे ‘सल’ आजही तेवढीच ताजी व भळभळती आहे.

  दरम्यान या कालखंडात नाराज होऊन स्वताच्या महत्वकांक्षेपायी पक्षातून बाहेर पडलेल्या एका नेत्याने दुसऱ्या पक्षाची कास धरली,आणी कार्यकर्त्यांनी आपआपल्या नेत्यावर विश्वास ठेवून कामाला सुरुवात केली. या काळात हा संघर्ष एवढा तीव्र झाला होता की,  काहीही संबंध नसताना या नेत्यांच्या असलेल्या बँक, पतसंस्था, शाळा या ठिकाणी प्रामाणिक पाने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला कुणा विरोधकांच्या समर्थकांसोबत पाहिले एवढ्याशा कारणावरून  अनेक कार्यकर्त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्या काळात अनेक नवयुवक देशोधडीला लागले. घराची परिस्थिती बेताची म्हणून नेत्यांचा , ” बेंबीच्या देठापासून प्रामाणिक पणे उदोउदो “करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या चुली त्या काळात अक्षरश: बंद पडल्या. अनेकांना गाव तालुका सोडून इतर शहरात बाहेरगावी जाऊन रोजिरोटी साठी  भटकावे लागले.त्यात त्यांच्या कुटुंबाची प्रचंड ससेहोलपट झाली.

     अनेक कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या बँका ,पतसंस्थांतून  नवीन  व्यवसाय अथवा इतर कामासाठी काढलेली कर्जे   अचानक भरण्यासाठी तगादा लावण्यात आला ज्यांना कर्ज भरणे शक्य ना झाल्याने अनेक कार्यकर्त्यांच्या बँकेत गहाण जमिनी लिलावात निघाल्या तर अनेक गावांमध्ये मारामारी झाल्या त्यातून अनेकांच्या अंगावर पोलीस केस झाल्या त्यात ते पूर्णपणे भरडले गेले. चांगले शिक्षण असूनही शासकीय नोकरीत त्यांना जाता आले नाही आशा बर्याच व्यथा अनेकदा  ऐकायला मिळतात.

       काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका  चित्रपटात रेखाटल्या प्रमाणे  तालुक्यातील  अनेक कार्यकर्त्यांची  स्थिती झाली  होती असे म्हणायला हरकत नाही.  परंतु वीस वर्षा नंतर पुन्हा विलग झालेल्या या नेत्यांना तालुक्याच्या विकासाचा साक्षात्कार झाला व हे नेते आपले दाखविण्यापूरते असलेले वितुष्ट विसरून एकत्र आले, एका आसनावर राजकीय व्यासपीठावर बसून एकमेकांविषयी गोड कौतुक गाताना दिसत आहे. या  या नेत्यांच्या  मिलणाने सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसत आहे .

         दरम्यान    वीस वर्षपूर्वी देशोधडीला लागलेल्या त्या  कार्यकर्त्यांचे काय? ज्यांनी आपले आयुष्य या  नेत्यांसाठी एकमेकात संघर्षात काढले.राजकीय बेरजेचे गणित करून एकत्रित आलेल्या  या  नेत्यांना तिकीटे मिळणार तर कुणाची चौकशी थांबणार,  तर कुणाला मोठमोठी शासकीय टेंडर मिळणार यातून टोकाचा संघर्ष करणाऱ्या या शेकडो कार्यकर्त्यांचे काय होणार? याचे उत्तर म्हणजे येणारा काळच असेल.

            राजकीय पटलावर नेते केंव्हाही एकत्र येतात. प्यादी मात्र देशोधडीला लागतात.यात काही नवे नाही. या नेत्यांनी सुरू केलेल्या शिक्षण संस्था , बॅंका, सहकारी संस्था या मार्फत कार्यकर्त्यांची आर्थिक कोंडी करत या कार्यकर्त्यांना मनाप्रमाणे वागवून घेण्यात यांना धन्यता वाटते. असे म्हणायला हरकत नाही. यात नवीन कार्यकर्त्यांनी मागील इतिहास जाणून घेऊन पुढे पाऊल टाकायला हवे आहे.

दरम्यान कारण म्हणतात ना? पुढच्याला ठेच लागली की मागचा शहाणा होतो पाहू आगोदारच्यांच्या ठेसांमधून पुढील पिढी काय? बोध घेते हे पाहणे महत्वाचे आहे. म्हणतात ना, पुन्हा असाच सुरू राहणार,” नेहमीच येतो पावसाळा” या म्हणी प्रमाणे  नवीन कळसूत्री कार्यकर्त्यांचा कारखाना.

1 Comment

  1. अशोक मोढवे

    March 31, 2024 at 3:17 pm

    कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो तो आयुष्य भर आपल्या नेत्यांसाठी चटाई उचलतो पण शेवटी त्यांचे पदरी निराशाच असते तो नेता आज येथे तर उद्या त्या पक्षात प्रवेश करतो त्याला कार्यकर्ते चे काही देणे घेणे नाही

Leave a Reply

Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Trending

Exit mobile version