शेतीशिवार
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरही येऊ शकते आत्महत्येची वेळ, यासाठी सर्वांनी एकत्रित लढा उभारण्याची गरज – शेतकरी नेते सुरेश नवले (अवहेलना दूध उत्पादकांची भाग- १)
अकोले (प्रतिनिधी) :- शेतकरी बांधवांच्या हातात खेळते भांडवल उपलब्ध करून देणारा मुख्य जोडधंदा म्हणून ओळखला जाणाऱ्या दूध व्यवसायात दिवसेंदिवस दुधाचे खरेदीचे दार कमी होत असल्याने या व्यवसायात वाढत चाललेल्या प्रचंड तोट्याने दूध व्यवसायिक शेतकरी देशोधडीला लागला असून यासाठी बळीराजाने एल्गार पुकारण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हाताला हक्काचा रोजगार मिळवून देणारा व्यवसाय म्हणून दूध धंद्याची ओळख, म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळत नाही. म्हणून उच्च शिक्षित तरुण दूध व्यावसायात आले विविध बँकांतून कर्ज काढून पंजाब सारख्या विविध राज्यांतील गाई विकत घेऊन त्यांनी दुध धंद्याला सुरुवात केली.
सध्या दुधाला प्रति लिटर ३.५ (सिग्धांश) व ८.५ (एस. एन.एफ.)ला २६/- रुपये किंवा त्यापेक्षा ही कमी भाव असल्याची चर्चा अनेक शेतकरी करीत आहेत. परंतु हेच दूध शहरी भागात मात्र प्रतिलिटर ५४/-दराने विकले जाते. म्हणजेच दूध डेअरीला प्रति लिटर २०/-ते२५/-रुपये निव्वळ नफा मिळत आहे. शासनाने कडक धोरण राबविल्यास डेअरी सुद्धा कमीत कमी १०/- ते १५/- रुपये प्रतिलिटर भाव वाढवून देऊ शकते यासाठी कोणत्याही शासकीय अनुदानाची गरजही नाही परंतु राज्यकर्ते यांच्या अनास्थेपोटी बळीराजावर वाईट दिवस आले असल्याचे दिसत आहे.
आज उन्हाळी परीस्थिती असल्याने दुग्धजन्य पदार्थांचा खप प्रचंड प्रमाणावर वाढलेला आहे. तरी देखील दुधाचे दर दिवसेंदिवस कमी होत आहेत. मात्र विविध दूध कंपन्यांकडून शहरी भागात विकल्या जाणाऱ्या दुधाचा व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा दर मात्र कमी झाला नाही. त्यामुळे डेअरी उद्योग मात्र नफा कमविण्यात व्यस्त आहे. उलट पक्षी मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक दृष्टया कंबरडे मोडले जात आहे.
दरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा गाजावाजा करत फेब्रुवारी महिन्यात पाच रूपये अनुदानाची मोठी घोषणा केली. परंतु ही योजना म्हणजे फुसका फटाकाच ठरला असल्याचे दिसते. कारण यात बहुतांशी दुध उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही प्रति लिटर पाच रुपये अनुदानच मिळालेलेच नाही.तर या अनुदानासाठी शासनाने लागू केलेल्या विविध जाचक अटी आणि शर्थी मुळे शेतकरी प्रचंड प्रमाणावर भरडला गेला असल्याचे दिसत आहे.
दरम्यान प्रत्यक्षात मात्र ही योजना म्हणजे “बोलाचीच कढी”,अन “बोलाचाच भात” या म्हणी पेक्षा वेगळी नसावी. शासनाने केलेली अनुदानाची घोषणा म्हणजे शेतकऱयांची केलेली फसवणूकच आहे अशी चर्चा सूरु झाली आहे. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे कथाकथित नेते देश आणि राज्य काबीज करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे कोणालाही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी साधा वेळही नाही असे दिसत आहे.
सर्व स्तरावर बळीराज्याच्या कुठल्याही शेती पिकाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या मेटाकुटीला आला असून ,बाजार भाव नाही. व शेतमाल व दुधाला भाव नसल्याने दिवसेंदिवस वाढणाऱ्या कर्जाच्या बोजामुळे, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांची अवस्था विदर्भ, मराठवाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांसारखी झाली असून, पुढील काळात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचे लोन सधन समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यात येऊन शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल की काय?अशी भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान डेअरी उद्योग जसा संघटीत आहे. तसा शेतकरी मात्र दुध उत्पादक,ऊस उत्पादक, भाजीपाला उत्पादक शेतकरी असा विभागला गेला आहे.म्हणुन सफेद दुधावर पोसलेल्या या सफेद कपड्यातील काळ्या बोक्यांचे फावले आहे. या साठी राज्यात शेतकऱ्यांचा भव्य एल्गार ऊभा करणे अपेक्षित आहे. यासाठी सर्व शेतकरी नेते व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे असे आवाहन शेतकरी नेते सुरेश नवले यांनी केले आहे.
(क्रमशः- A 2 दुधाच्या नावाखाली ग्राहकांची होत आहे फसवणूक ,पुढील भागात)