सामाजिक
आंबेगावचा फुललेला “वसंत”…काळाच्या पडद्याआड…..! -जेष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी वाहिली श्रद्धांजली
पुणे दि -(प्रतिनिधी)जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा प्रशासक काळ संपून मार्च 1992 मध्ये निवडणुका झाल्या. वसंतराव भागुजी भालेराव, बीएससी ऍग्री झालेला हा युवक आंबेगाव पंचायत समितीचा सभापती झाला. या दरम्यान मी ‘लोकसत्ता’ चा बातमीदार होतो. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अशी एकत्र मिळून पंचायत समिती होती. आज आमदारांना विकास कामांचे अधिकार एकवटले आहे. त्यावेळी पंचायत राज व्यवस्थेमध्ये आमदारांपेक्षाही किंबहुना थोडे जादा अधिकार पंचायत समिती सभापतींना होते. वसंतराव सभापती असले तरी त्यांच्यापुढे तगडे विरोधक त्यावेळी होते. सभापती हे जिल्हा परिषदेचे देखील पदसिद्ध सदस्य असल्याने त्याकाळी वसंतराव हे उच्चशिक्षित आणि मुद्देसूद मांडणी यामुळे सभागृहात ते लक्षवेधी ठरवायचे.
आंबेगाव पंचायत समितीचे सभापती असताना वसंतराव यांनी अनेक चांगले बदल आणि धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतले. विशेषता त्याकाळी आदिवासी भागामध्ये रस्ते, उन्हाळ्यात वाड्यावर त्यांवर सुरू करावे लागणारे टँकर, प्राथमिक शाळांच्या खोल्या, गुणवत्ता वाढीचे प्रकल्प.अंगणवाड्या इमारती, शेती विषयक योजना आणि विशेषता खरीप हंगामा आढावा बैठकीमध्ये सभापती भालेराव यांचे असणारे अभ्यासपूर्ण विवेचन हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील चकित पाडणारे असायचे. पाणीटंचाई, खरीप हंगाम आढावा बैठकांना जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या सर्व सभापती उपस्थित असायचे. अशावेळी भालेराव यांनी मांडलेले मुद्दे हेच बैठकीचे दिशादर्शक ठरायचे. अशा बैठकांमध्ये आंबेगाव चा हा’ वसंत ‘नेहमी फुललेला असायचा. त्यामुळे त्यांची छाप सगळ्यांवर पडायची.
लोकप्रतिनिधी म्हणून शासकीय वाहन असलेले सभापती हे तालुक्यामध्ये एकमेव पदाधिकारी असायचे. सदस्यांकडे स्वतःची चार चाकी सोडा, दुचाकी देखील नव्हती. सभेला उशीर झाला. आणि मुक्कामी एसटी घोडेगाव किंवा मंचर वरून निघून गेली तर अनेकदा भालेराव हे शासकीय वाहन इतर सहकारी सदस्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी पाठवून द्यायचे आणि स्वतः मात्र इतर व्यवस्था करून कळंबला जायचे. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेची सभा असेल तर हातात कागदपत्रांची फाईल, डायरी घेऊन ते सभेला जायचे.
अभ्यासू, रुबाबदार व्यक्तिमत्व आणि कामाचे वेगळेपण यामुळे अल्पावधीतच त्यांची आंबेगाव तालुक्याला आणि जिल्ह्याला देखील ओळख झाली. सभापती होण्यासाठी अनेक जण इच्छुक असायचे, परंतु भालेराव यांना हटवणे तालुक्यातील नेतृत्वाला त्यावेळी अशक्य झाले.
मी पुण्यात सामना मध्ये दाखल झालो. त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये भेट व्हायची. पत्रकार विठ्ठल जाधव ही माझी ओळख असली तरी मला ते आवर्जून विठ्ठलराव म्हणायचे. पुण्यातील पत्रकारितेमध्ये आपले कुणीतरी आहे. याचे त्यांना विशेष वाटायचे. आंबेगाव मध्ये सभापती भालेराव हे भविष्यातील स्पर्धक आहेत. हे ओळखून त्यांना राजकीय दृष्ट्या दाबण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अनेक राजकीय चढउतारा आणि नेते बघितले.मात्र त्यांनी स्वतःचे कर्तुत्व आणि अधिष्ठानाच्या जोरावर सभापती पदाची कारकीर्द यशस्वी आणि गौरवास्पद केली.
1997 नंतरची त्यांची राजकीय वाटचाल ही नेहमीच कुणाला तरी फायदा करून देणारी ठरली. प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली. काही कालखंड ते स्थानिक राजकारणात व्यस्त राहिले. नंतरच्या टप्प्यात सहकार आणि बाजार समितीच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊन ते आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती झाले. मंचर बाजार आवाराला नवा आयाम देण्यामध्ये सर्वात मोठा वाटा राहिला. शेतकरी केंद्रस्थानी म्हणून त्यांनी नव्याने गाळे आणि बाजार उभारणी केली. बाजार समितीच्या कामासाठी अनेकदा ते पुण्यात जिल्हा सहकार उपनिबंधक आणि पणन संचालक कार्यालयामध्ये वारंवार भेटवायचे. नवीन काय करतोय ते सांगायचे. जनहिताची त्यांची ही धडपड अखेरपर्यंत कायम होती. वसंतराव हा झेप घेणारा माणूस. स्पष्ट आणि परखड बोलणारा.पॉवर पॉलिटिक्स मध्ये अशा माणसांना नेहमीच अंडरस्टमेंट केले जाते. वसंतरावांना त्याही गोष्टीला सामोरे जावे लागले. परंतु तरीदेखील वसंतराव यांची राजकीय कार्तिक दही संस्मरणीय आणि दिशादर्शक ठरली. एक-दीड वर्षापूर्वी त्यांची अशीच भेट झाली. आजारपणाच्या मर्यादा स्पष्टपणे दिसत होत्या. तरी देखील मोठ्या उत्साहाने आणि दमदारपणे बोलताना त्यांनी अनेक गोष्टींना उजाळा दिला. वसंतराव यांचे अकाली जाणे मनाला वेदना देणारे, जनमानसात वसंतराव यांनी आपल्या कार्यकर्तुत्वामधून उमटवलेला ठसा प्रत्येकाच्या स्मरणात राहील.
मा.संतोषभाऊ बोऱ्हाडे
September 20, 2024 at 11:41 am
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !