राजकीय
आंबेगाव मध्ये महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर : निवडणुकीत सहभाग न घेण्याचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा निर्णय
मंचर दि. (प्रतिनिधी) आंबेगाव तालुक्यात खासदार आमदार पदे शरद पवार गटाकडे दिली.यापुढे तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा वाटा घोषित केल्या शिवाय शिवसैनिक निवडणुकीत सहभाग घेणार नाही .अशी भूमिका आंबेगाव तालुका शिवसेनाच्या (उद्धव ठाकरे) नेत्यांनी जाहीर केल्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नकारता येत नाही.
आंबेगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून युती व महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार असल्याची शक्यता असून यात महा युती तर्फे दिलीप वळसे पाटील तर महाविकास आधाडीतून देवदत्त निकम यांच्यात सरळ लढत होणार आहे.मात्र खासदार कोल्हे यांनी निवडूनआल्यानंतर महाविकास आघाडीच्या मित्र पक्षाकडे केलेले दुर्लक्ष यातून निर्माण झालेली मत भिन्नता यामुळे महाविकास आघाडीतील विविध विषयावर मतभेत चव्हाट्यावर आले आहेत.
दरम्यान मंचर येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या वेळी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम, जिल्हा प्रमुख सुरेश भोर,शिवसेना तालुका प्रमुख दत्ता गांजाळे, , माजी पं स सदस्य राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख दिलीपशेठ पवळे, मंचर शहर प्रमुख विकास जाधव घोडेगाव शहर प्रमुख नंदू बोऱ्हाडे, आदी मान्यवर उपस्थित होते
आंबेगाव मध्ये शिवसेनेची मोठी ताकद असताना देखील शिवसेनेला डावलले जातं आहे. त्यामुळे शिवसैनिक फक्त पालखी वाहणार नसून जर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणुकामध्ये शरद पवार गटाने शिवसेनेला तीन जिल्हापरिषद व सहा पंचायत समितीच्या जागा देण्याबाबत सहमती दर्शवावी तरच पुढील काळात शिवसैनिक आंबेगाव तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारास मदत करील अशी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच निकम यांच्याकडे याबाबत आजच्या बैठकीत चर्चा केली असता निकम यांनी जि. प. व पं. समिती विषयी बोलणे टाळले त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे निकम यांच्याकडून एकजुटीचे फोटो प्रसारीत करण्यात आले असले तरी पक्षाचा आदेश येईपर्यंत कोणताही निर्णय शिवसैनिकानी घेऊ नये असे तालुका प्रमुख दत्ता गांजाळे यांनी सांगितले
दरम्यान लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसैनिकांना अनेक अश्वासने दिली परंतु आज खासदार कोल्हे साधा फोनही उचलत नाहीत ज्यांच्यासाठी शिवसैनिकांनी प्रामाणिक काम केले त्या कोल्हेची शिवसैनिकांबाबतची भूमिका हि “गरज सरो व वैद्य मरो”अशीच असल्याचे बोलले जात आहे. पुढील काळात निकम यांना मदत करूनही जर निकम यांनी शिवसैनिकाना खासदार कोल्हे प्रमाणे पुढील काळात सन्मानाची वागणूक दिली नाही. तर पुढील शिवसैनिकांनी काय करावे ? त्यामुळे उमेदवार निकम व खासदार कोल्हे यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांसमोर जि प व पं .समिती चा “शब्द” दिल्याशिवाय शिवसैनिक निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.