राजकीय
शेतकऱ्यांना जमिनी विकाव्यात, यासाठी सुरु असलेली दडपशाही मोडून काढणार – अजित गव्हाणे
भोसरी दि (प्रतिनिधी)-: शेतकऱ्यांची इच्छा नसताना दडपशाहीच्या मार्गचा अवलंव करून जमीन विकन्यासाठी प्रवृत्त केले जातं असून ही प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी परिवर्तन करा असे आवाहन अजित गव्हाणे यांनी केले
महाविकास आघाडीतील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ जाधववाडी येथे मंगळवारी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधववाडी परिसरातील जेष्ठ नागरिक, येथील रहिवासी तसेच महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. प्रचाराच्या निमित्ताने सावता माळी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली. वाडा बोल्हाई मळा, जय बजरंग मित्र मंडळ, आहेरवाडी तालीम, सुभाष मित्र मंडळ, काळुबाई मंदिर कमान, आहेरवाडी चौक येथील नागरिकांची या दौऱ्यात भेट घेण्यात आली. यावेळी जाधववाडी ग्रामस्थांच्या समस्यावर गव्हाणे बोलत होते.
दरम्यान अजित गव्हाणे पुढे म्हणाले कि,जाधववाडीतील अनेक लोकांनी माझ्या कानावर अनेक गोष्टी घातल्या. इथे भूमिपुत्रांच्या जमिनी महापालिकेतील विविध आरक्षणे, रस्ते तसेच प्रकल्पांसाठी ताब्यात घेतल्या गेल्या. उर्वरित जागांचा विकास व्हावा अशी माफक अपेक्षा नागरिकांची असताना विविध कारणांनी दडपशाही केली गेली. मंजूर केलेले रस्ते ‘शिफ्ट ‘करण्यात आले. शेतकऱ्यांना जमिनी विकण्यासाठी प्रवृत्त करण्याची दडपशाही सध्या सुरू आहे. मात्र आता अशी दडपशाही चालू देणार नाही नाही. या दडपशाही विरोधातच नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत असल्याचे महाविकास आघाडीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी मंगळवारी सांगितले. या परिवर्तनातून मतदार संघाचा विकास होणार असल्याचे देखील गव्हाणे यांनी सांगितले .
दहा वर्ष आपण ज्यांना नेतृत्व दिले त्यांनी आपल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये नागरिक परिवर्तनाच्या मनस्थितीत होते ही परिस्थिती वेळोवेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत जात होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मला संधी दिली. महाविकास आघाडीतील शिवसेना ,काँग्रेस तसेच घटक पक्षातील नेते तसेच स्थानिक सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळेच या संघर्षाच्या लढाईचे बळ मिळाले आहे.यामध्ये तुम्हा नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
गेल्या दहा वर्षातील नियोजनाच्या अभावामुळे जाधववाडी परिसरामधील खंडित वीज पुरवठ्याची समस्या सुटलेली नाही. या भागात प्रचंड नागरिकरण वाढत असताना वीज पुरवठ्याबाबत सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत गेल्या दहा वर्षात ठोस उपाययोजना केली नसल्याचे दिसून येते. या भागात ट्रान्सफॉर्मर वाढवणे गरजेचे आहे. मात्र अपुऱ्या यंत्रणेवर अजूनही वीज पुरवठा होत असल्यामुळे वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी येथील नागरिकांच्या आहेत. आगामी काळात नवीन ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करणे, वीज वितरण विभागाचे सक्षमीकरण या गोष्टींसाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन गव्हाणे यांनी जाधववाडीतील नागरिकांना दिले.