राजकीय
पराभव समोर दिसू लागल्याने भाजप उमेदवाराकडून पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
भोसरी दि (प्रतिनिधी ) महाविकास आघाडीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव होताना दिसत आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक नागरिकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नागरिकांनी ही निवडणूक हातात घेतली असून गेल्या दहा वर्षातल्या दहशत, दडपशाहीला नागरिक चोख उत्तर देतील असे देखील अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित गव्हाणे, रविवारी (दि 17) पत्रकार परिषदेत बोलत होते. कासारवाडीतील कलासागर हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेला माजी आमदार विलास लांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, उमेदवार अजित गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते भरत लांडगे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले भोसरी मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक फेक नेरेटिव्ह सेट केला जात आहे. शनिवारी रात्री मतदारसंघातील गव्हाणे वस्ती भागामध्ये दोन कोटी रुपये सापडले आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती पसरवण्यात आली. असा काही प्रकार घडलेला नसताना जाणीवपूर्वक अशी माहिती पसरवली जात असल्याची तक्रार आम्ही पोलिसांकडे केली आहे. दोन महिन्यापूर्वीच दिघी पोलीस ठाण्यामधील काही पोलीस कर्मचारी वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी काम करत असून याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. याबद्दल आम्हाला जशी शक्यता होती तेच प्रकार सध्या घडताना दिसत आहे.आज त्याबद्दलची तक्रारही पोलीस आणि निवडणूक विभागाकडे केली आहे. संबंधित पोलीस खुलेआम भाजप आमदाराला सहकार्य करत आहे. हे प्रकार राजरोसपणे दिसत असतानाही त्यांच्या बाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्यामुळे हे लोकशाहीचे राज्य आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
भोसरीमध्ये शनिवारी रात्री जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवण्यात आली . आमची बदनामी करण्यात आली. विरोधी उमेदवाराकडून करण्यात येत असलेले हे प्रकार म्हणजे त्यांना पराभव समोर दिसत आहे . ही निवडणूक आता नागरिकांनी हातामध्ये घेतले आहे. दहशत, दडपशाही झुगारून नागरिक परिवर्तनाच्या मानसिकतेमध्ये आहे .राज्यभर देखील नागरिक परिवर्तनाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्र पेक्षा गुजरातच्या विकासाचा विचार भाजपचे नेते करताना दिसून येत आहे. तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे महाराष्ट्रातील सरकार बदलणार ही वस्तुस्थिती आहे असे देखील गव्हाणे यावेळी म्हणाले.
दरम्यान यावेळी बोलताना माजी आमदार विलास लांडे म्हणाले कि,जाणीवपूर्वक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यातून कार्यकर्त्यांना त्रास होत आहे. संभ्रम निर्माण केला जात आहे. खोटी माहिती मतदारसंघात पसरवली जात आहे याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त निवडणूक विभाग अशा सगळ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र कारवाई होताना दिसत नाही. शनिवारी रात्री भोसरीमध्ये जो प्रकार घडला ,जी बदनामी करण्यात आली. असा कोणता प्रकार घडला हे देखील पोलीस सांगत नव्हते. रात्री दोन वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे पदाधिकारी पोलीस स्टेशनमध्ये बसून होते. मात्र नक्की काय घडले? कुठे पैसे सापडले याबद्दल पोलिसांनाही नीट माहिती देता आली नाही. जाणीवपूर्वक हे प्रकार घडत असून पोलीस निवडणूक विभाग यांनी याची दखल घेतली पाहिजे असे लांडे यावेळी म्हणाले.
शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांनी आपलें मनोगत व्यक्त करताना सांगितले कि,भोसरी मतदारसंघांमध्ये “उलटा चोर कोतवाल को दाटे” असा प्रकार सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये लेखी स्वरुपाची अनेक पत्रे पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली. भाजप पदाधिकाऱ्यांसाठी पोलीस यंत्रणा राबवली जात आहे. “वरून आदेश आले आहेत” असे काही पोलिस अधिकारी खाजगीत आम्हाला सांगतात. साम-दाम-दंड-भेद असे सगळे प्रकार वापरून भोसरी विधानसभेमध्ये पैसे वाटपाचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. नागरिक पैसे वाटप झाले म्हणून सांगतात. पोलिसांकडे तक्रार केली की पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना प्रचार स्लिप वाटत असताना अटक केली जाते. खोट्या गुन्ह्यांच्या नावाखाली त्यांना अडकवले जात आहे. अशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जायचे होते तर जशा महापालिकांच्या निवडणुका रखडवल्या त्याचप्रमाणे विधानसभेच्या सुद्धा निवडणुका जाहीर करायच्या नव्हत्या .केंद्रातूनच सत्ता चालवायची होती असा संताप सुलभा उबाळे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मतदारसंघात काम करत असलो तरी शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही .कार्यकर्त्यांना त्रास झाला तर जशाला तसे उत्तर दिले जाईल. खोट्या आरोपाखाली कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. रात्रभर पोलीस यंत्रणा धिंगाणा घालत आहे. अशा प्रकारचे उद्योग पोलिसांनी बंद करावेत. निवडणूक विभागाने यामध्ये दखल घ्यावी. उचित कारवाई करावी अशी मागणी देखील सुलभा उबाळे यांनी यावेळी केली.